बुधवार ३० सप्टेंबर २००९

वारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...

मागील काही दिवसा पासून महाराष्ट्रा मध्ये स्वाइन फ्लू ने धुमाकूळ घातला, आमचे लोक घाबरून बिचारे घरातच बसून राहू लागले, तोंडाला रुमाल आणि मनामध्ये धास्ती.. सध्या हि परिस्थिती फारशी सुधारलेली नाही फ़क़्त आमच्या मेडिया वाल्यांनी त्या बातमीला थोडी बगल दिली आहे, कारण स्पष्ट आहे, सध्या महाराष्ट्र मध्ये अजुन एका भयंकर रोगाची लागन झालेली आहे, हा रोग म्हणजे राजकीय बंडखोरी. सर्वच राजकीय पक्ष या रोगाने त्रस्त झालेले आहेत . हा रोग तसा स्वाइन फ्लू पेक्षा हि महा भयानक.. या आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चाललेल्या या रोगाचा धसका सर्वच पक्षांनी घेतला आहे, सर्वच प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व गोंधळा मध्ये आम्ही मात्र पुन्हा घाबरून आप आपल्या घरातच बसून आहोत.. बाहेर चाललेला गोंधळ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.

वर्ष नु वर्षे फ़क़्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याचा अखेर सय्यम तुटला ... "पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात" असेच मानणार्यांची संख्या आता वाढली आहे, "अभी नही तो कभी नही " या उक्ती प्रमाणे सर्वच उम्मेद्वार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मांडवात उभे आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे, महाराष्ट्रा सारख्या राजकीय, सामाजिक तथा आर्थिक रित्या पुढारलेल्या आणि प्रगल्भ अशा राज्याच्या राजकारणाला लागलेले हे वळण नक्कीच येणाऱ्या एका धोक्याची पूर्व सूचनाच आहे.

या महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सांगतो कि इथे बरेचसे पक्ष मग ते राष्ट्रीय असो व क्षेत्रीय त्यांची ओळख हि काही ठराविक व्यक्तींमुळेच या महाराष्ट्राला झाली, मग ते यशवंतराव चव्हाण असो वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव नाईक असो, किंवा आजच्या काळातले शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे असो, ह्या लोकांची सामाजिक व राजकीय उंची हि नेहमीच येथील पक्षांच्या उंची पेक्षा जास्त राहिलेली आहे. ह्या लोकांनी केलेले कष्ट, त्यांची इमानदारी आणि त्यांची ती धमक या सर्व कारणामुळे आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना पक्षा पेक्षा नेहमी मानाचे स्थान दिले.

पण याच महाराष्ट्रात आज .. काल पर्वाचे स्वयंघोषित .. सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, कार्य सम्राट तथा स्वाभिमानी नेते जन्मास येऊ लागले आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजताच हे सर्व सम्राट सर्व शक्तीनिशी आप आपल्या आखाड्यात उतरण्याची तयारी करू लागतात. काही लोक पैसा .. दबाव .. आणि इतर बरेच काहींचा वापर करून आपले तिकीट मिळवण्यात यशस्वी होतात .. मग आमच्या याच वर्षानु वर्षे मागासलेल्या जिल्ह्यातील उरलेले २ ३ विकास पुरुष ज्यांना तिकीट नही भेटले ते त्यांच्या विरुद्ध दंड थोपटतात.

या सर्व प्रक्रिये मध्ये ज्याच्या साठी हे सर्व खेळ चालू असतो तो आमचा मतदार राजा मात्र कुठे तरी एका कोपर्यात चोर सारखा उभा आसतो आणि सर्व काही आपल्या या उघड्या डोळ्यांनी बघत असतो.

महाराष्ट्राच्या प्रश्नावर वेळोवेळी ज्यांनी आवाज उठवला आणि पक्षांनी त्यांच्या वर नेहमीच अन्याय केला त्यांच्या बद्दल नक्कीच मी बोलत नाहीये .. कारण ते लोक पक्षीय राजकारणाच्या नेहमीच वरचढ ठरले आहेत.

पण ४-५ वर्षे एका पक्षाच्या नावाने रोज रोज भाषण ठोकायची आणि प्रसंगी तिकीट नाही मिळाले तर त्याच पक्षाच्या विरोधात बोंब ठोकायची .. काल पर्यंत जे आदर्श होते, प्रेरणास्थान होते तेच नेते आज या लोकांना शत्रू वाटतात, अन्याय करणारे वाटतात.. खर तर या बंडखोरांना जनतेशी काहीच देणे घेणे नसते.. आपल्या हातातील सत्ता जात असलेली पाहून हे लोक आपला सर्वस्व पणाला लावतात.. आणि मग गेली अनेक वर्षे असलेली सत्तेची नशा.. जनतेचा नाश केल्याशिवाय राहत नाही.

खर तर सामन्यांचा नेता हा सामान्यच असला पाहिजे, पण आमच्या इथे सगळाच काही आलबेल दिसतंय .. आमचे अपक्ष उम्मेद्वार कोटींच्या घरामध्ये त्यांची मालमत्ता दाखवतात.. वर्षानु वर्षे आपल्याच घरात सत्तेची सारी पदे उपभोगतात.. मग आशा लोकांच्या दबावाखाली येऊन आमचे राजकीय पक्षा एक तर त्यांना उम्मेदावारी देतात नाही तर पुढील काही राजकीय सेटिंग केली जाते आणि त्यांना भरपूर मलई भेटणाऱ्या ठिकाणी त्यांना वसवले जाते.

ह्या राजकीय सत्ता प्राप्तीच्या वारी मध्ये आमचे हे राजकीय पुढारी म्हणजेच आमचे राजकीय वारकरी आपल्या वेग वेगळ्या दिंड्या पताके घेऊन निघालेले असतात .. आणि आमचा मतदार राजा पांडुरंगा सारखा आपल्या कमरेवर आपले दोन्ही हाथ ठेवून त्यांच्या कडे बघत असतो .. त्याला अजून हि आशा आहे कि माझ्या ह्या पंढरी मध्ये माझा सामान्य शेतकरी ..कष्टकरी .. सुखाने दोन घास खाईल आणि आनंदाने जगेल .. पण पांडुरंगा कधी तुझी ह्या बडव्यांच्या घेरावातून मुक्तता होणार आणि कधी तुला याची देही याची डोळा साक्षात पंढरी अवतरलेली दिसणार???

सध्या तरी .. दिंडी चालली चालली ... सत्तेच्या भक्षणाला... !!!

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

मंगळवार २९ सप्टेंबर २००९

तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय बी एन लोकमत ला मुलाखत]



इथे वाचा: आय बी एन लोकमत


शनिवार २६ सप्टेंबर २००९

या ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे

दोन खूप छान लेख:
निर्लज्ज बेटांची नगरी - माणिक मुंढे [स्टार माझा]

शिलांगण अर्थव्यवस्थेचे- डॉ. गिरीश जाखोटिया [लोकप्रभा ]
तुम्हाला नक्की आवडतील!

बुधवार २३ सप्टेंबर २००९

जिजाऊ

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळूमायाळू या आईच्या पदाराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.



जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!


प्रकाश बा. पिंपळे
www.jijau.com

रविवार २० सप्टेंबर २००९

ईद च्या हार्दिक शुभेच्छा

सर्व भारतीय बांधवाना ईद च्या हार्दिक शुभेच्छा!

शनिवार १९ सप्टेंबर २००९

महाराष्ट्र !


जय महाराष्ट्र,
महराष्ट्राचा हा केला गेलेला 'जय' अजून ही जनतेचा राजा शिवाजी महाराज यांच्याच कर्तुत्वाचा आहे. शतके लोटली आणि आम्ही अजून ही त्यांच्याच कर्तुत्वावर समाधानी आहोत आणि एकप्रकारे आमच्या [माझ्या] नाकर्तेपणाचा अभिमान बाळगत आहोत.
मधल्या काळात काही लोकांनी खूप प्रयत्न केले, पुन्हा तसे कर्तुत्व गाजवण्याचे [त्यांच्या प्रयत्नांना सलाम], पण पुन्हा त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जावा अस अजून ही काही झालेल नाही. दुसऱ्या कोणत्या राज्याचं अस झाल की नाही हे मला माहित नाही; पण महाराष्ट्राच नक्की व्हाव अशीच इच्छा महाराज बाळगत असतील! हे म्हणजे बापाच्या नावाची पाटी घराच्या दारावरून जाऊन तिथ लेकराच्या नावाची पाटी येते, तेंव्हा या गोष्टीचा बापाला अभिमानच वाटतो. हा अभिमान आम्ही महाराजांना कधी देणार?
आज महाराष्ट्राची identity /ओळख काय आहे? मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा!] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही? [हे माझे प्रश्न आधी मला स्वतःला आणि नंतर इतरांना आहेत].
माझ्या राज्याच मी [सामान्य माणूस] आणि या राजकारण्यांनी काय करून ठेवलय हेच मला कळत नाहीये. सामाजिक समतेच घ्या, अजून ही साऱ्या राज्यात दलित -बहुजन -उच्चवर्णीय असा भेद अजून ही कायम आहे. सगळी कडेच आहे.अस काही नाही असं कुणी जर म्हणत असेल, तर त्यांनी कृपा करून हे सांगावा की का मग दलितांचे मते जास्त भा.रि.प ला जातात, बहुजनाची मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जातात, ब्राम्हणांची मते बी.जे.पी ला का जातात? त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहतो? या जातीची एक संघटना, त्या जातीची एक संघटना; मग त्या प्रत्येकीला एका राजकीय पक्षाचा पाठींबा छुपा किंवा मग बेधडक!
एकंदर आम्ही पूर्ण हरलो नसलो तरी, सामजिक विषमते विरुद्धची लढाई जिंकण्याची लक्षणं अजूनही दिसत नाहीत! आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय! बदल घडायलाच हवा!
अंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरांना अजून ही आम्ही पूर्णतः उपटून टकलू शकलो नाहीत. कधी कधी वर्तमानपत्रात त्या कुणाला तरी चेटूक करते/करतो म्हणून जळलेल्या, मारलेल्या बातम्या येतातच! आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही! नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही? असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना! या जाचक रूढी बद्दल कायदे व्हायला हवेत आणि त्यांची मुख्य म्हणजे अंमलबजावणी व्हायला हवी!
उच्चशिक्षणाच्या बाबतीत आम्ही खूप काही केल आणि पैशाने उच्च असणाऱ्याना सहज शिक्षण दिले. तस नाहीये तर मग का शेतकऱ्याची आणि सामान्य माणसांची मुलं सहजा सहजी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाहीत? शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात! अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का? शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का ? नाहीत असच दिसतंय. किंवा असतील तर मग त्यांना संधी दिली जात नाही; ती संधी असे लोक शोधून त्यांना द्या, तुमच आणि तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांच कल्याण होईल.
Inclusive Growth च्या नावाने आम्ही गेली पन्नास वर्ष बोंबा मारत आहोत, कुणी 'शायनिंग भारत' म्हणत तर कुणी 'आमचा हात सामान्य माणसाच्या हातात' [दोन्हींनी गोष्टी घडतात, पण फक्त मतदानाच्या वेळेस]! सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच! सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का? किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात? का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो? आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब! ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही! बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शहरांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा! तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल! असं करणारीच लोकं सत्तेत आणि शासनात हवीत.
बदल घडायला हवा आणि तो घडवण्याची वेळ आणि संधी आली आहे, दूर दृष्टी ठेवणारे मग अपक्ष का असेनात, कुणा पक्षाचे का असेनात निवडून आलेच पाहिजेत! त्यांना पडाल तर, फक्त सत्तेसाठी आणि ती ही स्वार्थासाठी असं राजकारण करणाऱ्यांच्या हातात राज्य देऊन फक्त स्वतःचच नाही तर पुढच्या पिढ्यांचं आणि शिवबाच्या महाराष्ट्राच वाटोळ कराल!





जय महाराष्ट्र! जय शिवाजी! जय जिजाऊ !

प्रकाश बा. पिंपळे
www.jijau.com
[माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही]



बुधवार १६ सप्टेंबर २००९

मराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




१७ सप्टेम्बर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

त्या तमाम थोर स्वातंत्र्य विभूतींना आमचे कोटि कोटि प्रणाम



दिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण


सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, September 16th, 2009 AT 9:09 AM

नवी दिल्लीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. (सकाळ न्यूज नेटवर्क छायाचित्रसेवा)

नवी दिल्ली - "शिवरायांचा आठवावा प्रताप' या उक्तीचा आज दिल्लीत प्रत्यय आला. निमित्त होते शिवाजी महाराज स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानीत उभे राहिलेले स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना आज या स्मारकाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्‌घाटन झाले। या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्ण बातमी साठी इथे क्लिक करा http://beta.esakal.com/2009/09/16003956/national-new-delhi-shivaji-mah.html

धन्यवाद् सकाळ न्यूज़.

उठ मराठ्या उठ ..

गेले दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हनल।

मुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.

खरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.
त्यांची हि हिम्मत कशी झाली? कधी विचार केलाय का आपण.. का अजून हि गप्प आहात.

१०६ हुतात्म्यांचा बळी घेऊन दिल्लीश्वरांनी आपल्याला आपल्याच हक्काची मुंबई दिली, नव्हे आम्ही ती हिसकावून घेतली, मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हणले जाते. या मुंबई च्या उभारणी मध्ये आमच्या मराठी माणसाने आणि मराठीवर प्रेम करणारे सर्व जाती -धर्म आणि भाषेचे लोक ह्यांनी वाहिलेल्या रक्ताची आणि घामाची ह्यांची पावती म्हणून हि मुंबई या सबंध देशासमोर एक फार मोठे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून समोर आले आहे .

आम्हा मराठी बांधवांनी नेहमी आलेल्या पाहुण्यांचे आगदी मनापासून स्वागत केले, त्यांना आपल्या घरामध्ये जागा दिली, त्यांना पोसले . पण आज त्यातलेच काही लोक फ़क़्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी साक्षात मराठी च्या विरोधात उभी राहिली आहेत.
ज्या अर्थी हे बाहेरचे काही मुठभर युपी - बिहारी नेते ह्या साठी जबाबदार आहेत तेवढेच आपण हि या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.

गेली वर्षे मी या मुंबई मध्ये राहतो, पण एक सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणले होते .." मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे , पण मुंबई मध्ये कुठे हि महाराष्ट्र दिसत नाही" तीच भावना माझी हि झाली. का बोलले ते असे? तेव्हा मराठी लोक नव्हते का? होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान! तेव्हा झोपलेला हा आमचा मराठी माणूस आज पर्यंत गाढ निद्रिस्त अशा अवस्थेत पडला आहे.

आम्ही कधी आमच्या मागील चुकांपासून काही शिकणार आहोत. मागे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला आमच्या स्वाभिमानाची जान करून दिली आता त्याच साठी शिवसेना आणि राज साहेब ठाकरे आप आपल्या परीने लढत आहेत. पण आम्हाला नेहमी का अशी कोणी तरी चिथावत ठेवण्याची गरज लागते. आम्हाला काहीच कळत नाहीये का, हि जबाबदारी फ़क़्त काही राज ठाकरे आणि त्यांच्या सारख्यांची आहे का .. ते कोणा साठी लढत आहेत .. आपल्याच साठी ना .. मग आपण असा कित्ती दिवस असे सर्व गोष्टींपासून स्वतः ला दूर ठेवणार आहोत.

माझे तमाम मराठी मनाच्या लोकांना आवाहन आहे कि जागे व्हा ... या पुढील काळ खूप कठीण राहणार आहे, खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे, राजकारणाच्या नावाखाली पुन्हा एकदा मराठी माणसाचा बळी देण्यात येईल आणि आपण हि मुंबई कायमची आपल्या हातातून घालवून बसू, मग पुन्हा "आपल्याला काय त्याचे" म्हणणारे सुद्धा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.

स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाच्या अधिकाराची भाषा आमच्या महाराष्ट्राला शिकवण्यात येत आहे, पण आम्ही कधी हि कोणाचे अधिकार मारणार नाहीत पण प्रसंगी आमच्या हक्कांसाठी मरायला हि मागे पुढे पाहणार नाहीत.

देशाच्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून जातो .. आपल्या देशामध्ये एकूण कर भरणाऱ्या पैकी एकट्या महाराष्ट्रातून जाणारा कराचा वाटा हा सर्वात जास्त आहे याचे कारण म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या शहरामध्ये इमाने इतबारे काम करणारा आमचा मराठी माणूस. उद्या जर हि मुंबई महाराष्ट्र पासून तोडली गेली ना मग आमचे हेच दिल्लीश्वर (उत्तरे कडील काही भ्रष्ट नेते) या महाराष्ट्राच्या तोंडाला कायमची पाने पुसल्याशिवाय राहणार नाहीत

एकीकडे मुंबई मध्ये परप्रांतीयांना मोफत घरांचे वाटप होत आहे, झोपडपट्ट्या कायदेशीर ठरवल्या जात आहेत ...आणि याच आमच्या महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये गरीब आणि सामान्य माणसांचे शोषण होत आहे. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत कसल्या हि प्रकारच्या ठोस योजना नाहीत, आणि इथे फ़क़्त मतांच्या राजकारणासाठी हे भडवे रोज नवीन एक एक खेळ मांडत आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन गोष्टींचा कधीच वेगवेगळा विचार करता येणार नाही .. हे सत्य असून ती काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई वर आणि मराठी भाषेवर आलेले हे संकट आपल्या सर्वांना मिळूनच दूर करावे लागेल. हे संकट कुठल्याही प्रकारच्या राजकारणाने नाही तर समाजाच्या एकत्र ताकदीने दूर केले पाहिजे. मराठी माणसाने फ़क़्त आणि फ़क़्त मराठी मधेच बोलायला पाहिजे, "ह्याने काय होते त्याने काय होते, हि मानसिकता आता सोडावी लागेल ..कोणी म्हणताय म्हणून उसने अवसान आणलेला तथा स्वार्थी मराठी बाणा आम्हाला आता नकोय , आम्हाला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर गंभीर पणे विचार करणाऱ्या माणसांची, त्या साठी प्रामाणिक पणे झटनार्यांची . तेव्हाच पुन्हा एकदा सर्वांना सामावून घेणारा पण स्वतःची अस्मिता कधी हि मिटू देणारा एक महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहील.

मराठी भाषा आणि मराठी अस्मिता फ़क़्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये .. हे हि आपण लक्षात ठेवा.

ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व .. आम्हाला फ़क़्त आमच्या प्रश्नांशी जुडलेल्या नेत्यांनाच द्यायचे आहे. उठ-सूट मतांची झोळी घेणून फिरणाऱ्या भिकाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्या ..

या महाराष्ट्राला परत ते तेजस्वी रूप देण्यासाठी पुन्हा एकदा .. उठ मराठ्या उठ ..

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

(मी कोणत्याही राजकीय पक्षाशी सालाग्नित नाहीये, नाही कोणाच्या विचारांनी प्रभावित होऊन लिहिले आहे .. पण एक मराठी म्हणून जे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि जे माझ्या मनाला वाटले तेच इथे व्यक्त केले. बाकी तुम्ही सर्वस्वी जाणते आहातच, तेव्हा आपणच आता विचार करावा )

सोमवार १४ सप्टेंबर २००९

धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

ज्या माणसाने वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.

इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी - दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली आहे.

याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही .. आरे गेली कित्येक वर्षे आमच्या या राजाची बदनामी चाललेली आम्ही काय झोपलो आहोत का?

खरा इतिहास जाणून घेण्यासाठी .. छत्रपती संभाजी राजांच्या त्या समाधी स्थळी आपले मस्तक टेकवण्यासाठी .. त्यांच्या अदम्य आणि विराट शक्तीला नमन करण्या साठीच आम्ही सर्व या तुलापुराला गेलो.

याच ठिकाणी स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.
संभाजीराजांचा देह रंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.

आम्ही स्वतः ला भाग्यवान समजतो कि आम्ही त्यांच्या समाधी स्थळाशी असलेली माती आमच्या कपाळी लाऊ शकलो.

सर्वांनी जरूर जावे असे हे ठिकाण ... आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, खऱ्या संभाजी ची ओळख करून घेण्यासाठी तुळापुर ला एकदा तरी भेट द्यावी।

शेवटी
एकच घोष या उरातून निघतो .............

धर्मवीर संभाजी महाराज कि जय... छत्रपती शिवाजी महाराज कि जय .. राजमाता जिजाऊ माँ साहेब कि जय

आणखी कही फोटो इथे आहेत ....




अमोल सुरोशे

बुधवार ९ सप्टेंबर २००९

आमची माती आणि आमचेच माणसं...

आमची माती आणि आमचेच माणसं...

या एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. !

माफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.

जो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या महाराष्ट्राची आज दशा आणि दिशा या दोन्ही हरपल्या सारख्या वाटत आहेत. हा महाराष्ट्र गेली शतकानु शतके उभा आहे तो इथल्या ग्रामीण संस्कृतीच्या जोरावर.. इथल्या कष्टकरी आणि इमानदार सामान्य माणसाच्या जोरावर, याच महाराष्ट्राने सबंध देशा समोर अनेक वेळा उत्कट राष्ट्रप्रेमाचे उदाहरण दिले आहे.

पण आज परिस्थिती बघता खरच मन खिन्न होते, आज जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्याला दिसून येईल कि आज आमच्या राज्यामध्ये एकीकडे खेडी भकास पडत आहेत .. ग्रामीण भागात रोजगार नाही.. धंदे नाहीत .. पुरेशा सोयी सुविधा नाहीत म्हणून लोक वरचेवर शहरांकडे विस्थापित होत आहेत, आणि दुसरीकडे आमची शहरे अपूऱ्या साधन संपतीमुळे, अपूऱ्या नियोजनामुळे एखाद्या भयानक साथीच्या रोगा सारखी विचित्र पणे वाढत आहेत .

मला या सर्व गोष्टींचे नवल या साठी वाटते कि स्वातंत्र्य काळातील सुरुवातीच्या पुढार्यांनी एक खूप सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पहिले होते, आज त्यांचे तथाकथित वारस कोणत्या न कोणत्या मार्गे आपली सत्ता कायम राखून आहेत. मग कुठे गेली त्यांची स्वप्ने, आणि गेली ६० वर्षे आम्ही का अजून हि पाणी, वीज, रास्ते याच विषयांवर निवडणुका लढत आहोत.

आज आमच्या महाराष्ट्र कडे काय नाहीये .. सर्वात जास्त धरणे महाराष्ट्र मध्ये असताना आमच्या इथे फ़क़्त ५ टक्के जमीन हि ओलिताखाली आलेली आहे.. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दिवसोंदिवस गंभीर होत चालाल आहे, एकीकडे मुंबई - पुण्या सारख्या शहरामध्ये रोषणाई चा भरमसाट उपयोग होतो आणि एकीकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये २० २० तास लाईट नसते.

आमच्या ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण सुद्धा आम्ही नीट नाही पोहोचू शकलो , बसायला साधे बाकडे नाही आहेत , शिकवायला शिक्षक नाहीये , स्वच्छता गृह नाहीये, न हि त्यांना एक पूर्ण शिक्षण देण्यासाठी तेवढा कुशल कर्मचारी वर्ग तिथे आहे.. मग कशा प्रकारे हे उद्या बाहेर पडून या जीवघेण्या स्पर्धे मध्ये टिकणार. तज्ञ शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शनच नाही भेटले तर ते तरी कसे घडणार.

आज १०० कोटींच्या या देशात आम्हाला अनेक खेळाडू, वैज्ञानिक, शिक्षक, साहित्यिक तथा विचारवंत भेटू शकतील पण त्यांना पुरेशा संधी मिळाली तर. हे सर्व कौशल्य आपल्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर सापडले जाते पण शासन त्यांच्या साठी काहीच करत नाही..

मी स्वतः कित्येक ठिकाणी ग्रामीण भागात आपल्यालाही हेवा वाटावा अशा हुशारीची मुले बघितली आहेत , पण संधी आणि मार्गदर्शनाच्या अभावी ते लोक तिथेच खितपत पडतात.

हे सर्व बदलण्या साठी आपल्याला नवीन विचारांची कास धरावी लागणार आहे, शुद्ध चारित्र्याची तथा आधुनिक महाराष्ट्राची स्वप्ने पाहणारे लोक प्रतिनिधी आपल्याला पुढे पाठवावे लागतील. आमचा प्रतिनिधी हा अम्च्यातूनच निर्माण झालेला हवा, आयत्या मिळालेल्या प्रतिष्ठे च्या जोरावर अजून कित्येक वर्ष आपण त्याच त्या निष्क्रिय नेत्यांना वर पाठवणार आणि वर्ष नु वर्षे फ़क़्त महाराष्ट्राच्या समस्यांवरच चर्चा करणार,

आम्हाला हा महाराष्ट्र घडवणारे लोक हवे आहेत, त्यांना शोधा, त्यांना साथ द्या , त्यांच्या लढाई मध्ये आपला हि आवाज सामील होऊ द्या .. त्याला एकाकी पडण्यासाठी प्रस्थापित सर्वोपतरी प्रयत्न करणारच .. पण या लोकशाही मध्ये जो खरा राजा आहे .. त्याने ह्या सर्वां विरुद्ध आपले सर्वात मोठे मतदानाचे हत्यार आता उगरायालाच पाहिजे ... आमच्या सर्व महाराष्ट्रातील मतदारांनी न चुकता या वेळेस आपले मतदान केलाच पाहिजे.

मला खात्री आहे .. भावनिक विषयांवर गेली कित्येक वर्षे आपण नुसते घरात बसून चर्चा केली .. आता आपण बाहेर पडू .. एक बदल घडवायला. ते आपले कर्तव्यच आहे .

सध्या साठी जय महाराष्ट्र ...... पुन्हा भेटू
अमोल सुरोशे

मंगळवार ८ सप्टेंबर २००९

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाजदार राजू शेट्टी ह्यांची एक मुलाखत

त्यांची काही अतिशय आवडलेली वाक्ये:
सेक्युलर आणि जातीयवादी, धर्माध या असल्या वैचारिक वादातच आपली १० वर्षे निघून गेली. आणि त्याचा फायदा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाच झाला. आमच्या दृष्टीने एक वाघ, तर दुसरा वाघोबाच! जातीयवाद्यांचा फायदा होता कामा नये, म्हणून ज्यांनी निवडणुका लढवल्या अथवा नाही लढवल्या ते सगळे संपले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरचा उरला सुरला वैचारिक अंकुशही नष्ट होण्यात झाला.
म्हणूनच आता तरी चांगल्या गोष्टी घडवून आणायच्या असतील तर लोकांसमोर सक्षम पर्याय हवा. तरच दबाव गट निर्माण होऊ शकतो. जनतेला लुटणारा दरोडेखोर सेक्युलर असावा की जातीयवादी असावा; हा प्रश्नच निर्थक आहे. शेवटी दरोडेखोर तो दरोडेखोरच ना! म्हणूनच या दरोडेखोरांपासून राज्याला वाचवायला हवं.

 












आम्ही एकच म्हणू:
बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत, प्रस्थापितांनी आपल्या मोठ्या जहाजा सांभाळाव्यात!

अधिक लोकप्रभावर वाचा-
http://www.loksatta.com/lokprabha/20090911/tea.htm



बुधवार २ सप्टेंबर २००९

या देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी यांचा जास्त हक्क आहे !

एक बर्याच गोष्टींचा सारांश सांगणारी ओळ डोक्यात आली:
This country owes more to the farmers and workers than to the capitalist!

या देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी यांचा जास्त हक्क आहे !
----प्रकाश बा. पिंपळे
[google वर कुणाच्याही नावाने सापडली नाही!]

मंगळवार १ सप्टेंबर २००९

रणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि या लढ्यात सामील होऊ ..

विधानसभेच्या तारखांची घोषणा झाली आहे .. आता वेळ आहे आपले प्रश्न मांडण्याची, ते सोडवण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांनाच पुढे पाठवण्याची .. आपल्याला माहिती साठी खालील वेळापत्रक

  • एकूण जागा : २८८
  • राखीव : ५४ (अनु.जाती २९, अनु. जमाती २५)
  • एकूण मतदार : कोटी ५६ लाख ३४ हजार ५२५
  • एकूण मतदान केंद्रे : ८२ हजार २८
  • मतदार फोटो ओळखपत्रे : ८०.३५ टक्के
  • फोटोंसह सज्ज असलेल्या मतदारयाद्या : ७३.२८ टक्के
  • निवडणूक अधिसूचनेची तारीख : १८ सप्टेंबर २००९
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : : २५ सप्टेंबर २००९
  • उमेदवारी अर्जांच्या छाननीची तारीख : २६ सप्टेंबर २००९
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २९ सप्टेंबर २००९
  • मतदानाची तारीख : १३ ऑक्टोबर २००९
  • मतमोजणी : २२ ऑक्टोबर २००९
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : २५ ऑक्टोबर २००९